पणजी : सध्या देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. काही राज्यांमध्ये कर्फ्यु लागू करण्याची वेळ आली असून, यातच आता कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. गोव्यात कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची सक्ती असूनही स्थानिक तसेच पर्यटकही तोंडाला मास्क न लावताच फिरतात. मास्क न लावलेल्यांना १०० रुपये दंड आकारण्यात येत होता, तरीही काहीजण जाणुनबुजून तो वापरत नव्हते. त्यामुळे ही दंडाची रक्कम दुप्पट (२०० रुपये) करण्यात आली होती, मात्र ही कारवाई फक्त 2-3 दिवसच करण्यात आल्यामुळे पहिले पाढे पंच्चावन्न अधी परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात पर्यटन क्षेत्र खुले करण्यात येऊन पर्यटकांना येण्यासाठी मोकळीक देण्यात आली. मात्र, कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे सर्वांनाच सक्तीचे आहे. पोलिस, मामलेदार, पालिका मुख्याधिकारी व पंचायत सचिवांना मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले होते. परंतु ही कारवाई फक्त 2-3 करण्यात आली त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र, सुरक्षित अंतर, मास्क हे नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.
राज्यात कोविडचे प्रमाण कमी झाल्याने स्थानिक लोक तसेच पर्यटक बेफिकिरपणे वावरत आहेत. मार्केट, समुद्रकिनारे तसेच हॉटेल्स व रेस्टॉरंट्समध्ये गर्दी करू लागले आहेत. प्रवासी बसेसमधूनही प्रवाशांची गर्दी असते. कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात नाही. लोक गटागटाने एकत्र उभे राहत आहेत. पर्यटन स्थळाच्या ठिकाणी गर्दी होत आहे. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांचे (एसओपी) पालन करण्याचा पूर्ण फज्जा उडाला आहे. गोव्यात कोरोना संसर्ग तसेच मृत्यूचे प्रमाण या महिन्यात बरेच कमी झाले आहे, मात्र पर्यटकांच्या या बेशिस्तीमुळे पुन्हा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अधिक वाचा :
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.